Perani

Category:

Description

पेरणी

शेती व्यवसाय व कृषी संस्कृती हाच आपल्या भारतीय समाजाच्या जगण्याचा मुलाधार आहे.आपल्या हजारो पिढ्या गाव खेड्यातील या शेती मातीत राब राब राबल्या.शेतीमातीशी इमानी राहतच त्यांनी आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिला.परंतु शेती व्यवसायाला अलीकडच्या काळात प्रचंड अवकळा प्राप्त झाली आहे. शेतीवर गुजराण होणं आता कठीण होऊन बसलंय.तरीही शेतीमातीशी इथल्या कुणब्यांची कुस्ती चालूच आहे.अपार काबाडकष्ट करूनही मात्र त्यांच्या वाट्याला या व्यवस्थेने सुखा समाधानचे जीणे जाणीवपूर्वक येऊच दिले नाही.कुणब्यांची जगण्याची ही मुकवेदना अनेकांनी शब्दबद्ध केली आहे. शेतकरी मायबापांच्या या दुःखभोगी यातनांना व कष्टमय जगण्याला आपल्या कवितेतून शब्द देणारे शेती माती संस्कृती, त्यांचे प्रश्न,व्यथा,वेदनांना अतिशय ताकदीने अभिव्यक्त करणारे नव्या पिढीचे कवी ज्ञानेश्वर गायके हे आजचे आघाडीचे कवी आहेत.

युद्ध पेटले आहे

कवीच्या काळजात घर करून बसलेल्या योजना लेखणीतून पाझरत जातात.जगण्याने सोसलेले असंख्य घाव,जीवन संघर्षाच्या आगीत होरपळून निघालेला जीव आपली आर्त व्याकूळ कहाणी मुखर करीत जातो.ज्यामध्ये भूतकाळाची भळभळ आहे.वर्तमानाची आच आहे आणि भविष्याची चिंता आहे.व्यक्तिगत अनुभुतीबरोबरच समूहाची सर्वकष क्रांतीची भाषा हा कवी बोलू पाहतोय,जी क्रांतिदर्शी आहे.

हा कवी मानवतेसाठी हर तऱ्हेच्या शोषणाविरुद्ध, विषमतेविरुद्ध लढण्याचा निर्धार करतो.अमानवियतेवर प्रहार करताना माणसांचं गाणं गातो. शोषण विरहित समाजाचे स्वप्न पाहणाऱ्यांना जोपर्यंत शोषण होत राहील तोपर्यंत त्याविरुद्धचे युद्धही सुरूच राहील असा निर्वाणीचा इशारा देताना निर्णायक लढ्याला सज्ज होऊ पाहणारी ही कविता आहे.